लखनौ – पाकिस्तान दहशतवाद पोसत आहे, असे लखनौमधील शिया मुस्लिमांच्या गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळवले आहे. पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दलही या गटाने चिंता व्यक्त केली आहे.
“ऑल इंडिया शिया हुसैनी फंड’ या गटाने पंतप्रधान मोदींना लिहीलेल्या पत्रात पाकिस्तानात गेल्या 35 वर्षांपासून शियांच्याविरोधात दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याचे म्हटले आहे. या कालावधीमध्ये पाकिस्तानात किमान 30 हजार शियांना ठार करण्यात आले आहे. शेजारच्या अफगाणिस्तानमध्ये शिया हाजरा समुदायाच्या मशिदी आणि शाळांवरही हल्ले केले जात असतात, असेही या पत्रात म्हटले आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी हे भारताचे आणि शिया समुदायाचे शत्रू आहेत. या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जाऊ द्यावे आणि आपल्यासह अन्य शियांना प्राणार्पण करण्याची परवानगी भारत सरकारने द्यावी, अशी मागणीही संघटनेचे सरचिटणीस सईद हसन मेहंदी यांनी पंतप्रधानांकडे मागितली आहे.
गेल्या महिन्यात 4 मार्च रोजी पाकिस्तानातील पेशावरमध्ये शिया समाजाच्या मशिदीमध्ये झालेल्या स्फोटात 60 जण ठार झाले होते. त्यामध्ये 10 वर्षांखालील 7 मुलांचाही समावेश होता. तर या स्फोटात किमान 200 जण जखमी झाले होते.