प्रशांत जाधव
कामाच्या व्यापातून विरंगुळा हवाच; पर्यटनाच्या ट्रीपची जिल्ह्यात उगाचंच रंगलीय चर्चा
सातारा – सातारा जिल्ह्यातील दोन तहसीलदार सध्या गोव्याला गेल्याची चर्चा भलतीच रंगली आहे. त्यांच्या गोवा ट्रिपमुळे “वाळूचे कण रगडिता गोवा ट्रीप मिळे,’ अशी चर्चा म्हसवडपासून महाबळेश्वरपर्यंत अन् शिरवळपासून कराडच्या वडगावपर्यंत लई जोरात सुरू आहे. लोकांना काय नुसत निमित्तच पाहिजे असते. लोकांचा सततचा त्रास, सह्या करून करून थकलेले बिचारे गेलेत तर जाऊ द्यायच ना, कशाला उगाच चर्चा करायची.
गोव्याला जाण्याइतपत त्यांना सरकार पगार पण देतयं. त्यामुळे कुणा वाळूवाल्याने त्यांना पैसे पुरवण्याची गरज नसावी. पण लोकांचं आपलं उगाचं चाललयं वाळूवाल्याच्या पैशावर त्या गोव्याला गेल्या. बरं, आता गेल्यात तर जाऊ द्या, सगळे बिच, समुद्राच्या खळाळत्या लाटांचा आनंद त्यांना सुखाने मिळू द्या. बिचाऱ्यांना परत किती कष्ट घ्यावे लागतात, हे चर्चा करणाऱ्यांना कुठं माहिती आहे.
तहसीलदार म्हणजे तालुक्याचा मालक असं गोऱ्या इंग्रजांच्या काळापासून बोललं जातं, अन् आम्ही पामर पाहतोय तसे आम्हालाही तेच वाटतं. त्यांना वाटलं तर रावाचा रंक अन् रंकाचा राव होण्यास फारसा वेळ लागत नाही.
मग इतक्या मोठ्या पदाच्या माणसाला कुणी गोव्याला फिरायला पाठवले तर त्यात नवल कसले आलयं. आख्खा तालुका त्यांना सांभाळयचा असतो, साध्या प्रतिज्ञापत्रापासून ते मोठमोठ्या जमिनींच्या देण्याघेण्यापर्यंत आणि नशिबानं तालुक्यात असलीच एखादी नदी तर वाळू कुणी आपल्या परवानगीशिवाय चोरत तर नाही ना, याची भलतीच चिंता त्यांच्या डोस्क्याला असतेच.
त्यात न्यायदंडाधिकाऱ्यांचा अधिकार असल्याने लोकांच्या केसेसचे निकाल देणे, त्यात कुणाच्या बाजूने निकाल द्यायचा त्याचे जजमेंट काढायचे ही काय कमी तापाची कामे आहेत का? त्यामुळे थोडं कुठं हवापालटासाठी गेलेत तर त्यांना जाऊ द्या. आदरणीय तहसीलदार, लोकांच्यात सुरू असलेल्या चर्चेकडे जास्त लक्ष देऊ नका, त्यांना काय काम नसत्यात. त्यामुळे ते नेहमी असंच करत्यात. त्यामुळे या सगळ्याकडे दुर्लक्ष करून मस्तपैकी गोव्याच्या बिचवर मजा करा.
पण हो, हे करताना आपल्या तालुक्यातले कोण तिथे आले नाही ना याचा अंदाज घ्या. नाहीतर उगाच एखादा फोटो तालुक्यात व्हायरल व्हायचा. पण त्यासाठी लई बिचकू नका, शेवटी झाला व्हायरल एखादा फोटो तरी होऊ द्या, काय म्हणून लोकांना घाबरायचं. ते नावं ठेवायलाच असत्यात, तुम्ही नका लक्ष देऊ. मस्तपैकी समुद्रकिनारी सगळा आळस झटकून द्या, जमलंच तर तिकडच्या समुद्रातील वाळूचा अंदाज घ्या. असलीच वाळू तर लगेच आपल्याकडच्या वाळूवाल्यांना कळवा. मग बघा “सिंघम’ सिनेमात जयकांतच्या मागे गाड्या धावल्या तसे तुमच्या मागे डंपर धावतील, मग लागलीच त्याचे एखादे टिकटॉक करून पाठवा. तुमच्या दौऱ्यावर जळणाऱ्या तालुक्यातील लोकांच्या व्हाटस्ऍपवर.
तुम्ही गोव्याला किती हौसेने गेला होता, जाताना बिचपासून ते राहण्याचे हॉटेल अस सगळ नेटक नियोजन केले होते. अन् लोक बोलत्यात वाळूवाल्यांच्या पैशावर तुम्ही गोव्याला गेला. अस कसं बोलू शकत्यात ही माणसं? टक्कुर पार फिरलयं बघा. तुम्ही तालुक्यात असल्यावर वाळूवाले तुमच्या मागेपुढे करत्यात हा काय तुमचा दोष आहे का.? तुम्ही एखादे काम सांगितले तर गडी नुसतं धावत्यात, यात तुमचा काय दोष.? एखाद्या पेपरात नुसतं तुमचं नाव छापून आलं तरी वाळूवाल्यांच्या अंगाचा पापड होतो. यात तुमचा काय दोष.? लोकांना काहीही बोलू द्या, तुम्ही बिलकूल लक्ष द्यायचे नाही.
तुम्हाला वाळूवाल्यांचे लाखात हप्ते आहेत, वाळूवाले तुम्हाला अधूनमधून नड लागली तर पैकाबी पुरवत्यात, तुमच्या कार्यालयात गोरगरिबांची लूट होती, तुम्ही शनिवार रविवार गावाकडं जाताना सरकारी गाडी नेता, पुढच्या आठ-दहा दिवसांत तुमच्या तालुक्यातील वाळूंचे लिलाव निघाणार आहेत, त्यासाठीच तुम्हाला गोवा दर्शन घडले आहे, निघाणाऱ्या वाळू लिलाव कोणाला द्यायचा यासाठी “आपसात मिटवून एकानेच टेंडर भरा’, असा सल्ला तुम्ही दिला. असले बरेच काही लोकं बोलतील. पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका.
मस्तपैकी गोव्यातील सगळे बिच, समुद्रकिनारे आवडत असतील तर धार्मिक मंदिरे बघून या. गेलाच आहात तर मासे, करीवर ताव मारा. कारण पुन्हा लवकर जालं असे नाही. परत एकदा सांगतो लोकांना जे बोलायचे ते बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. तुमच्या गोवा ट्रिपची लै चर्चा झाल्याने बिचारे वाळूवाले तुमच्या बदलीच्या भीतीने धास्तावले आहेत. त्यामुळे लवकर परत या “सगळे लिलाव काढल्याशिवाय जाणार नाही’, असा आधार त्या गरिबांना द्या. म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी सिंगापूरला जाता येईल.