नवी दिल्ली : हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात असणाऱ्या कुलभूषण जाधव विषयी भारताने पाकिस्तानकडे एक मागणी केली आहे. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना कुठल्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.
इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये २० जुलै फेरविचार याचिका दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्याआधी ही परवानगी द्यावी असे भारताने म्हटले आहे. अर्टी-शर्थीविना भेटण्याच्या परवानगीशिवाय पाकिस्तानने चर्चेसाठी इंग्रजी भाषेची सक्ती करु नये, अशी मागणी सुद्धा भारताने केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात असून हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली आहे.
आयसीजेच्या निकालानुसार, काऊंन्सलर अॅक्सेस तसेच मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी पूर्व अट असल्याची भारताने पाकिस्तानला आठवण करुन दिली आहे. भारतीय दूतावासातील दोन अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने केली आहे. मागच्या आठवड्यात कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. भारताने याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.
कुलभूषण जाधव प्रकरणातील एफआयआर, पुरावे, न्यायालयाच्या आदेशासह कोणतीही संबंधित कागदपत्रे भारताला देण्यास पाकिस्तानने नकार दिला. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान आयसीजेच्या निर्णयाचे पालन करण्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.