दादागिरी मोडीत काढणार
शरद पवारांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात कुटुंबिय व नातेवाईकांना उमेदवारी दिली. महाराष्ट्र पवार कुटुंबियांचा नसून जनतेचा आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पवारांची घराणेशाही व दादागिरी यंदाच्या निवडणूकीत मोडीत काढणार असल्याची, खरमरीत टीका उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांवर केली आहे.गजानन बाबर पुन्हा शिवसेनेत
मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार गजानन बाबर यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा ध्वज आणि उपरणे देऊन स्वागत करण्यात आले.
पिंपरी – दिल्लीत भगवा फडकविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती केली आहे. भाजप, शिवसेनेची वज्रमूठ मजबूत करुन देशाच्या विकासासाठी जनतेने शिवसेना व महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी केले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उध्दव ठाकरे यांची काळेवाडी येथे जाहीर सभा गुरुवारी आयोजित केली होती. या प्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय राऊत, खासदार अमर साबळे, शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर, गजानन बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, रविंद्र नेर्लेकर आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात देशात विकास केल्याने मतदारांना आत्मविश्वासाने सामोरे जात आहोत. संपूर्ण देशात विकासाची गंगा वाहत असून विरोधकांना प्रचाराचा मुद्दा नसल्याने हवालदिल झाले आहेत. यामुळे, महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणून गेल्या 60 वर्षात देशाचे वाटोळे करणाऱ्या कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या बकासूरांना घरी बसवा, असा घणाघात ठाकरे यांनी केला.