कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली असली, तरी जागा वाटप काही झालेले नाही. सन 2009 मध्ये कॉंग्रेसकडे संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड हे पाच हे राष्ट्रवादीकडे नगर शहर, अकोले, कोपरगाव, राहुरी, पारनेर, नेवासा, शेवगाव-पाथर्डी हे सात मतदारसंघ होते. सध्या जागा वाटपात कॉंग्रेसने पूर्वीच्या पाच जागांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी कर्जत-जामखेड व श्रीगोंदा या दोन जागा देण्यास तयार नाही. परिणामी, कॉंग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र आहे. अर्थात वरिष्ठपातळीवर या दोन जागांच्या बदल्यात नगर शहराची जागा देण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. आघाडी झाली असल्याने जागा वाटपातून ही आघाडी तुटणार नाही ऐवढ्यापर्यंत न ताणता तडजोड करण्याचे धोरण दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतले आहे.
युतीमध्ये अद्याप जागा वाटप निश्चित न झाल्याने युतीचे चित्र देखील अजून धुसर आहे. त्यावर जिल्ह्यात काही मतदारसंघातील आघाडीच्या नेत्यांचे राजकीय समीकरणे ठरणार आहे. त्यामुळे ही नेते मंडळी युती न होण्यासाठी देव पाण्यात ठेवून आहेत. सन 2009 मध्ये शिवसेनेकडे नगर शहर, पारनेर, संगमनेर, अकोले, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर हे सात तर भाजपकडे शेवगाव- पाथर्डी, कर्जत- जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, नेवासा. आता विखे व आमदार वैभव पिचड भाजपमध्ये आल्याने अकोले, शिर्डी हे दोन्ही मतदारसंघ सहाजिकच शिवसेनेकडून भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दोन जागा कमी होणार असून त्या बदल्यात जिल्ह्यातील कोणत्या दोन जागा भाजप शिवसेनेला देणार हा प्रश्न आहे. श्रीगोंदा ही एकमेव जागा शिवसेनेला भाजप सोडू शकते. उर्वरित एकही जागा देणे भाजपला परवडणार नाही. परिणामी, उमेदवारी न मिळणारे भाजप व शिवसेनेचे इच्छुक आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. एवढी वर्षे पक्षात काम केले, पण पक्षांतर करून अन्य पक्षातील विद्यमान आमदार पक्षात आल्याने तसेच वर्षानुवर्ष त्यांच्या विरोधात संघर्ष केला. आता त्यांचा प्रचार करावा लागणार हे भावनाच असहाय्य करणारी असल्याने त्याचा भाजप व शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.
(उत्तरार्ध)
दुरंगी किंवा तिरंगी होणाऱ्या संभाव्य लढती
अकोले- वैभव पिचड, अशोक भांगरे, किरण लहामटे.,
संगमनेर- बाळासाहेब थोरात, साळीग्राम होडगळ, विक्रम खताळ.,
श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे, लहु कानडे.,
कोपरगाव- स्नेहलता कोल्हे, आशुतोष काळे, राजेश परजणे.,
राहाता – राधाकृष्ण विखे., राहुरी- शिवाजी कर्डिले, प्राजक्त तनपुरे.,
नेवासे- बाळासाहेब मुरकुटे, शंकर गडाख, विठ्ठलराव लंघे.,
शेवगाव- पाथर्डी – मोनिका राजळे, प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले.,
कर्जत – जामखेड – प्रा. राम शिंदे, रोहित पवार.,
श्रीगोंदा- बबनराव पाचपुते, राहुल जगताप, अनुराधा नागवडे.,
नगर शहर- संग्राम जगताप, अनिल राठोड, अभिषेक कळमकर.,
पारनेर- विजय औटी, नीलेश लंके.