नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप उमेदवार शशी थरूर यांच्या टीमने पक्षाच्या मुख्य निवडणूक प्राधिकरणाला पत्र लिहून केला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशमधील सर्व मते अवैध ठरवण्याची मागणीही केली आहे.
केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांना लिहिलेल्या पत्रात, थरूर यांचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी सलमान सोझ यांनी म्हटले आहे की, या ठिकाणच्या मतदानातील गैरप्रकार धक्कादायक आहेत. उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रक्रिया विश्वासार्हता आणि सचोटीपासून खूप दूर आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
सोझ यांनी मिस्त्री यांना सांगितले की, उत्तर प्रदेशात जे काही दिसले ते “तुमच्या कार्यालया”च्या अधिकाराला खुले आव्हान आहे आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुका घेण्याच्या कॉंग्रेस अध्यक्ष आणि कॉंग्रेस कार्यकारिणीच्या आदेशांचा अवमान आहे. सोझ यांनी असेही म्हटले आहे की खर्गे यांच्यासाठी उत्तर प्रदेशातील कॉंग्रेस मतदारांनी जो गैरप्रकार केला त्याची खर्गे यांना कल्पना नाही, त्यांना ही माहिती मिळाली असती तर खर्गे यांनीच हा प्रकार रोखला असता, असेही त्यांनी नमूद केले आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीला कोणताही कलंक लागू नये याची दक्षता खर्गे यांनाही घेतली असती, असेही सोझ यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील मंजूर यादीत गैरहजर असलेल्यांची मते दुसऱ्याच कोणत्या तरी लोकांनी टाकली आहेत, असा थरूर यांच्या टीमचा प्रमुख आरोप आहे.