नवी दिल्ली – ताजमहाल प्रकरणाची सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने रजनीश सिंग यांची याचिका फेटाळून लावली आहे. ताजमहालच्या बंद असलेल्या 22 खोल्यांच्या तपासाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. काही दिवसांपूर्वी अयोध्येतील रहिवासी असलेले भाजप कार्यकर्ते डॉ. रजनीश सिंह यांनी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात ही याचिका दाखल केली होती. ताजमहालाबाबत रिट अर्जाद्वारे याचिकाकर्त्याने 22 बंद खोल्या उघडून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, याचिका न्यायालयीन मुद्द्यांवर आधारित नाही. यासोबतच सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, अशा याचिकेवर सुनावणी करता येणार नाही. ते या प्रकरणी तथ्य शोध समिती स्थापन करू शकत नाहीत.
दरम्यान, न्यायालयाने याचिकाकर्त्याला खडे बोलही सुनावले. बंद खोल्यांबाबत विचारणारे तुम्ही कोण? तुमच्यानुसार इतिहास वाचला जाईल का? याचिकेच्या व्यवस्थेची खिल्ली उडवणे योग्य नाही, असे न्यायालयाने फटकारले. तसेच ताजमहाल कोणी बांधला याचे संशोधन करा, विद्यापीठात जाऊन पीएचडी करा, असे उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले.
याचिकाकर्त्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल करून ताजमहालमधील 22 बंद खोल्या उघडण्याची मागणी केली होती, जेणेकरून या 22 बंद खोल्यांमध्ये काय आहे हे लोकांना कळू शकेल. याबाबत आरटीआयद्वारे माहिती मिळविण्याचा प्रयत्नही केला होता, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. त्याला हे जाणून घ्यायचे होते की ताजमहालच्या या 22 खोल्या का बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र आरटीआयमध्ये मिळालेल्या उत्तराने ते समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.