कोलकाता – आज काही विरोधी पक्ष परस्परांच्या विरोधात बोलत असले तरी आणि त्यातील काही जण कॉंग्रेसला दूषणे देत असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी हे सारे पक्ष एकत्र येतील कारण त्यांचे एकसमान लक्ष भाजपला पराभूत करणे हे आहे असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रातील भाजप सरकारच्या कारभारावर टीका करताना ते म्हणाले की गेल्या सात वर्षात गुड गव्हर्नन्स कोठेच दिसून येत नाही. केवळ घोषणाबाजी आणि प्रतिकात्मकता एवढ्यावरच हे सरकार चालले आहे. ते काल त्यांच्याच एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी बोलत होते. ते म्हणाले की, देशात आज कोणालाही मोकळेपणाने बोलू दिले जात नाही.
मोकळेपणाने बोलणाऱ्यांचा आवाजच दाबून टाकला जात आहे. अशा वातावरणात अजून आपल्याला अडीच वर्ष काढायची आहेत. राजकारणात एक आठवडा म्हणजे सुद्धा खुप कालावधी असतो पण लोकसभेच्या निवडणुका अजून अडीच वर्ष दूर आहेत.
एवढा काळ भाजपचा गैरकारभार सहन करणे अवघड आहे असेही त्यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाला पराभूत करणे एवढेच विरोधी पक्षांपुढील उद्दीष्ट नाही तर त्याची धोरणे आणि त्यांची राजकारणाची पद्धतही पराभूत झाली पाहिजे असे ते म्हणाले.