कोलकाता – तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या सुचनेचे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी स्वागत केले आहे. तथापि या प्रक्रीयेत कॉंग्रेस पक्षच केंद्रीय भूमिका बजावेल असे विधानही त्यांनी केले आहे.
राज्यसभेतील कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, विरोधकांची एकजूट व्हावी ही कॉंग्रेसचीही स्पष्ट भूमिका आहे. कॉंग्रेस अध्यक्ष आणि कार्यकारिणीने यावर वारंवार जोर दिला आहे. यापूर्वी कॉंग्रेसने सर्वांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे असेही शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
आम्हाला यापुढील काळात विरोधी ऐक्यासाठी प्रामाणिकपणे एकत्र काम करावे लागेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने कॉंग्रेस पक्षाचा पराभव केला असला तरी, 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसची मतांची टक्केवारी प्रादेशिक प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 19.55 टक्क्यांनी जास्त होती, कोणीही प्रादेशिक पक्ष देशव्यापी मतांपैकी 5 टक्के देखील मिळवू शकला नाही असेही शर्मा यांनी निदर्शनाला आणून दिले.
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सत्तेत आहे, तर झारखंड, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात ते आघाडी सरकारमध्ये आहेत.27 मार्च रोजी, बॅनर्जी यांनी कॉंग्रेससह सर्व गैर-भाजप मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांना पत्र लिहिले, ज्यात त्यांनी सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची अत्यंतिक गरज व्यक्त केली आहे.