नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा
पाटण – कोयना धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यास सुरूवात करूनही धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी आवक होत असल्याने शनिवारी पुन्हा दुपारी दीड वाजता कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलण्यात आले. त्यामुळे धरणातून कोयना नदीत प्रतिसेकंद 11 हजार 314 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे कोयनेसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
27 जुलैपासून 8 ऑगस्टपर्यंत सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वर, नवजा आणि कोयना येथे विक्रमी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळेच 3 ते 8 ऑगस्ट या पाच दिवसांच्या कालावधीत धरणात 50 टीएमसीहून अधिक पाण्याची आवक झाली होती. कोयना धरणाची निर्मिती 1961 साली झाल्यापासून पाच दिवसात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने या अतिवृष्टीने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले होते.
धरणाच्या पायथा वीजगृहातून 1 ऑगस्टला कोयना नदीत पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली होती. तर 3 ऑगस्टला दुपारी 1 वाजता कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे तीन फुटाने उचलून पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे 3 ऑगस्टपासून 16 ऑगस्टपर्यंत सलग 13 दिवसात धरणातून कोयना नदीत तब्बल 66 टीएमसी पाणी विनावापर सोडावे लागले होते. त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्याने 16 ऑगस्टला वक्री दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यानंतर 19 ऑगस्टला पायथा वीजगृहातून सोडले जाणारे पाणीही पूर्णपणे बंद करण्यात आले होते.
त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील पाटण, कराड तालुक्यांसह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणास येण्यास मोठी मदत झाली होती. मात्र आता शुक्रवारी सकाळी प्रथम पायथा वीजगृहातून तर शनिवारी दुपारी सहा वक्री दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कोयना नदीसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.