पंढरपूर – स्व. इंदिरा गांधीच्या काळात देखील अनेक नेते कॉंग्रेसला सोडून इतर पक्षात गेले होते, मात्र जनता कॉंग्रेस पक्षाबरोबर होती. तिच परस्थिती यावेळी देखील आहे, कॉंग्रेस सोडून गेलेले सर्व नेते सत्ता आल्यानंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये येतील असा आशावाद सोलापूरचे कॉंग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गांवरून काढलेल्या प्रचार रॅलीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्यावेळी स्व. इंदिरा गांधी यांच्या हातून सत्ता गेली होती. त्यावेळी पक्षातील अनेक नेत्यांनी असाच पळ काढला होता. यानंतर 1980 मध्ये पुन्हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली देशात कॉंग्रेसचे सरकार आले आणि पक्ष सोडून गेलेली नेते मंडळी पुन्हा कॉंग्रेस मध्ये दाखल झाली होती. यावेळी ही निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला सोडून गेलेले सर्व नेते पुन्हा कॉंग्रेसमध्ये येतील. अशी आपणास खात्री आहे, असे ते म्हणले.
या देशात सर्वधर्म समभाव राहिलाच पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे, अशी आमची भावना आहे. काही लोक मात्र धर्म आणि जातीच्या आधारावर राजकारण करु पहात आहेत. वंचित बहुन आघाडीने कट्टर जातीयवादी असलेल्या एमआयएमबरोब युती केली आहे. त्यातच ज्या पक्षाची हयात जाती धर्माच्या विरोधात गेली, त्याच सीपीएमने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिल्याने देश वेगळ्या दिशेने चालला आहे, असे दिसते. हे रोखण्यासाठी जनतेने आता कॉंग्रेस पक्षाला निवडून दिले पाहिजे असे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी केले.