मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचस सरकार हे पाच वर्षे चालणार. आमच्या सरकारला काहीही धोका नाही. शरद पवारांच्या पाठिंब्याने हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. पूल बिहारमध्ये पडलेत. आधीच्या सरकारने बांधलेले पूल पडले आहेत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही. सगळे पूल भक्कम आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार पाच वर्षे चालणार यात आमच्या कोणाच्याही मनात काही शंका नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधकांनी आम्हाला कोणतेही सल्ले देऊ नयेत. उद्धव ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. या सरकारला कोणताही धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. पार्थ पवारांवर शरद पवारांनी जी टीका केली होती त्यामुळे अजितदादा नाराज आहे का? किंवा ही त्यांच्या नाराजीची सुरुवात मानली जाते आहे का? असे प्रश्न विचारले असता संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे सरकारचा आधार आहेत. ते शरद पवारांच्या वक्तव्यामुळे नाराज नाहीत. शरद पवार यांनी त्यांच्या नातवाबाबत केलेलं वक्तव्य ही त्यांची व्यक्तीगत बाब आहे. मी यावर अधिक काय बोलणार असं त्यांनी म्हटलंय. तसंच अजित पवार या सगळ्यामुळे नाराज आहेत या चर्चांना काहीही अर्थ नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. मुंबई तसेच महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास असल्याचे शरद पवार यांनी यावेळी म्हटले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.