साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती
देऊळगाव राजे-राज्यातील सर्व साखर कारखाने 25 नोव्हेंबरपासून सुरू होतील. स्वातंत्र्योत्तर काळानंतर प्रथमच महाराष्ट्रातील उसउत्पादकांची किमान आधारभूत किंमत उशिरा देणाऱ्या आठ साखर कारखान्यांनी त्यावरील 15 टक्के व्याज शेतकऱ्यांना दिले आहे. पुढील काळात राज्यातील साखर कारखानदारांची मक्तेदारी मोडीत काढणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
दौंड शुगर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
गायकवाड म्हणाले, जानेवारी महिन्यात साखर आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर 11 महिन्यांत एकाच व्यक्तीचे आयुष्यात पाहिले नसतील एवढे रंग पहावयास मिळाले. राज्यात 102 सहकारी तर 93 खासगी साखर कारखाने आहेत. त्यातील 25 ते 30 साखर कारखाने डबघाईला आले आहेत. मागील गाळप हंगामाची किमान आधारभूत किंमत पूर्ण न केलेल्या एकही साखर कारखान्याला अद्याप गाळप परवाना दिलेला नाही. किमान आधारभूत किमतीपोटी 23 हजार दोनशे कोटी रुपये आजपर्यंत शेतकऱ्यांना दिले आहेत.
- स्वतः ऊस तोडून द्या
तोडणी वाहतूक खर्च जास्त दाखवून कारखानदार किमान आधारभूत किंमत कमी देतात. याला पर्याय म्हणजे शतकऱ्यांनी स्वतःचा ऊस स्वतः तोडून दिला तर उसउत्पादकांना पूर्ण आधारभूत किंमत मिळविण्याचा अधिकार आहे.