मुंबई – गुजरात टायटन्सचा कर्णधार व भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्याकडे नेतृत्वाची क्षमता आहे व त्याने ते सिद्धही केले आहे, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
हार्दिकला लगेचच भारतीय संघाचा कर्णधार बनवले पाहिजे, असे मी म्हणणार नाही; पण संघाचे नेतृत्व सोपवण्यासाठी जे काही पर्याय निवड समितीसमोर आहेत, त्यात हार्दिकचा निश्चितच समावेश असावा. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याने कर्णधार म्हणून यशस्वी होत असताना वैयक्तिक कामगिरीकडे दुर्लक्ष केले नाही. आधी त्याने कामगिरी सिद्ध केली व संघातील अन्य खेळाडूंनाही प्रेरित केले. त्याचा हाच गुण त्याला एक चांगला कर्णधार ठरवतो, असेही गावसकर म्हणाले.
पंड्याला जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो केवळ फलंदाजी व गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू असल्याचे लक्षात आले. मात्र, त्याच्याकडे नेतृत्वाचेही गुण आहेत हे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिसून आले. त्याने यंदाच्या स्पर्धेत 14 सामन्यांत 10 विजय व 4 पराभव अशी कामगिरी करत प्लेऑफमध्ये संघाला प्रवेश मिळवून दिला. या विजयात त्याने मोलाचा वाटा तर घेतलाच होता. मात्र, ज्या पद्धतीने त्याने खेळाडूंना प्रेरित केले, संघबांधणी केली ती कौतुकास्पद आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी सक्षम पर्याय म्हणून पाहिले गेले, तर आनंद होईल, असेही गावसकर म्हणाले.
तंदुरुस्ती महत्त्वाची
पंड्याने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना आपल्या तंदुरुस्तीकडेही लक्ष दिले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत पाठदुखीने त्रस्त झाल्यावर त्याला काही मालिकांना मुकावे लागले होते. त्यानंतर त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली व आयपीएलमध्ये यशस्वी पुनरागमन केले. आता येत्या काळातही त्याला या गोष्टीकडे सातत्याने लक्ष द्यावे लागणार आहे, असेही गावसकर म्हणाले.