“मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’ गुढीपाडव्यानिमित्त संकल्प
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
पुणे – करोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहेत. या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्व धर्मगुरूंनी “आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
राज्यातील जनतेला गुढीपाडव्यानिमित्त टोपे यांनी शुभेच्छा दिल्या. त्या देताना “मी घरी थांबणार, करोनाला हरवणार’, असा संकल्प करण्याचे आवाहन टोपे यांनी मंगळवारी केले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनता आणि माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यात आतापर्यंत 107 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे 15 रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहेत. ही समाधानाची बाब आहे. या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे असे आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडताहेत. ही गंभीर बाब आहे. राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे टोपे यांनी नमूद केले.
सध्या मुंबई, पुण्याहून मूळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र अशा लोकांना गावात प्रवेश दिला जात नाही. त्यांच्याकडे संशयाने न पाहता आपल्या परिजनांना गावी येऊ द्या, त्यांना अडवू नका, असे आवाहन टोपे यांनी यावेळी केले. बाधित रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने वागतानाच माणुसकी सोडू नका अशा सूचनाही टोपे यांनी दिल्या. उद्या असलेल्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त जनतेला शुभेच्छा देतानाच नववर्षांची सुरुवात करोनाला दूर सारण्याच्या दृढनिश्चयाने करा. या विषाणूवर विजय मिळवण्याचा संकल्प करा. स्वयंशिस्त पाळून घरी थांबा, असेही टोपे यांनी सांगितले. खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी (ओपीडी) बंद ठेवली आहे. वास्तविक संचारबंदीतून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नये, असे आवाहनही टोपेंनी केले.