मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका बॅलेटवर घेण्यात याव्यात यासाठी मुंबईत आज विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. देशात अनेकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे पार पडलेल्या निवडणुका आणि होऊ घातलेल्या निवडणुकांवर संशयाचे ढग आले आहेत. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाकडून आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याचे विधान विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईत आयोजित बैठकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर आपला विश्वास नसल्याचे म्हटले. तसेच राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख आजच्या बैठकीला उपस्थित होते. पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी आम्ही एक फॉर्म काढून ते लोकांकडून भरुन घेणार आहोत. निवडणुका बॅलेटपेपर घेण्यात याव्यात अशा मागण्यांचे फॉर्म सर्वपक्षीय कार्यकर्ते लोकांकडून भरुन घेतील. 21 तारखेला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.