मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्बमुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल देशमुख यांनी गृमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्व मंत्री एक-एक करून राजीनामे देतील आणि अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही राजीनामा द्यावा लागेल, अशी टीका रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
सीबीआयकडून यापूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे यांची चौकशी करण्यात आली होती. या दोघांच्याही चौकशीत अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांची नाव समोर आली होती. आता याप्रकरणी अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांनाही सीबीआयकडून चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
रामदास आठवले म्हंटले कि, माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुखांवर केला आहे. देशमुख यांच्या दोन सहाय्यकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. मला वाटतं की अशा प्रकारच्या अजून नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे सरकारमधील सर्व मंत्री राजीनामा देतील आणि शेवटी उद्धव ठाकरेंनाही राजीनामा द्यावा लागेल, असे त्यांनी म्हंटले आहे.
राज्यातील करोनाचा वाढत्या रुग्णसंख्येवरही रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, गर्दी होत आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन लागू करायला हवा. मजुरांना याचा फटका बसता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. पण राज्य सरकारने योग्य ती पाऊले उचलले नसल्याने राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.