नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत करोनाचा वाढता संसर्ग पाहता केजरीवाल सरकारने देखली विद्यापीठातील सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्व विद्यापीठातील परीक्षा रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील सेमिस्टरमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मनीष सिसोदिया यांनी सर्व विद्यापीठांना शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. करोना संसर्गामुळे परीक्षा न घेणे आणि पदवी प्रमाणपत्र न देणे अन्याय होईल. हा निर्णय राज्यातील सर्व विद्यापीठांना लागू आहे.
दरम्यान, दिल्लीमधील सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षांबाबत केंद्राने निर्णय घ्यावा, असेही सिसोदिया म्हणाले. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षांबाबतही असाच निर्णय घ्यावा, असे निवेदन दिले आहे.