संयुक्तराष्ट्र – भारताची संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळावर दोन वर्षांसाठी हंगामी (नॉन पर्मनंट) सदस्य म्हणून नियुक्ती झाली असून भारताच्या या सदस्यत्वाचा कालावधी आज पासून सुरू झाला आहे.
संयुक्तराष्ट्रांचे हे पंधरा सदस्यांचे सुरक्षा मंडळ अत्यंत शक्तिशाली समजले जाते. भारताबरोबरच नॉर्वे, केनिया, आयर्लंड आणि मेक्सिको हे देशही हंगामी सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी निवडले गेले आहेत. भारताची या मंडळावर हंगामी सदस्य म्हणून निवड होण्याची ही आठवी वेळ आहे.
भारताला ऑगस्ट 2021 मध्ये अध्यक्षपदाचीही संधी रोटेशन प्रमाणे मिळणार आहे. अशीच संधी भारताला पुन्हा सन 2022 सालातही मिळणार आहे. सुरक्षा मंडळाच्या नियमानुसार प्रत्येक देशाला या मंडळाचा महिनाभरासाठी अध्यक्ष होण्याची संधी मिळत असते आणि अशा पद्धतीने दर महिन्याला मंडळाचा अध्यक्ष बदलत असतो.
या मंडळावर कायम सदस्यत्व मिळावे म्हणून भारत गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. पण काही देशांनी भारताच्या या प्रयत्नांना आडकाठी निर्माण केली असली तरी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मोठ्या प्रमाणात भारताला पाठिंबा मिळत आहे.