माधव विद्वांस
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचा पाया घालणारे मेजर जनरल सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांचा आज स्मृतिदिन. त्याचा जन्म 23 जानेवारी 1814ला लंडन येथे झाला. त्यांचे वडील ऍलन कॅनिंगहॅम हे स्कॉटिश कवी होते. मोठा भाऊ जोसेफ यांच्यासह त्यांनी लंडनच्या ख्राइस्ट हॉस्पिटलमध्ये प्रारंभिक शिक्षण घेतले.सर वॉल्टर स्कॉटच्या प्रभावामुळे जोसेफ आणि अलेक्झांडर दोघांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या ऍडिसकॉम्बे सेमिनरीमध्ये कॅडेट्सशिप मिळविली आणि त्यानंतर रॉयल इंजिनियर्स इस्टेटमध्ये तांत्रिक प्रशिक्षण घेतले. वयाच्या 19व्या वर्षी बंगाल इंजिनिअर्समध्ये अलेक्झांडर द्वितीय लेफ्टनंट म्हणून रुजू झाले आणि 9 जून 1833 मध्ये भारतात आले व 28 वर्षे त्यांनी भारत सरकारच्या सेवेत घालविली.
भारतात आल्यानंतर लगेच त्यांनी पुरातत्त्व संशोधक जेम्स प्रिन्सेप यांची भेट घेतली. त्यांनी भारतीय इतिहास आणि पौराणिक साहित्याचा अभ्यास केला. वर्ष 1841 मध्ये कॅनिंगहॅम यांना अवधच्या राजासाठी कार्यकारी अभियंता बनविण्यात आले. ग्वाल्हेर जवळील मोरार नदीवर कमानदार दगडी पूल बांधण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पंजाबमधील सोब्रॉनच्या लढाईच्या आधी बियास नदीवर दोन पूल बांधण्यास त्यांनी मदत केली. 1942 मध्ये त्यांना बुंदेलखंडातील उठाव मोडून काढण्यासाठी बोलावले गेले. वर्ष 1846 मध्ये त्यांना सी. ए. व्हॅन्स अँग्यु यांच्यासह चीन आणि तिबेटच्या सीमांच्या सीमांकनासाठी आयुक्त म्हणून नेमण्यात आले. वर्ष 1847 मधे लडाख-तिबेट सीमा स्थापन करण्यासाठी कॅनिंगहॅम यांच्या नेतृत्वाखाली दुसरे कमिशन स्थापन केले गेले होते, याच कालखंडात त्यांनी कसमोरमधील अनेक मंदिरांना भेटी दिल्या व आर्यन ऑर्डर ऑफ आर्किटेक्चर हा प्रारंभिक निबंध त्यांनी लिहिला.
अशा प्रकारे पंजाब, कासमोर, गुजरात अशा अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्याने तेथील ऐतिहासिक वास्तू व मंदिरे यांचा अभ्यासही त्यांनी केला. वर्ष 1837 मध्ये त्यांनी कर्नल एफ. सी. मॅसे यांच्यासमवेत सारनाथ येथे उत्खनन केले आणि शिल्पांची काळजीपूर्वक रेखाटणी केली. वर्ष 1842 मध्ये त्यांनी संकसा येथे आणि 1851 मध्ये सांची येथे उत्खनन केले. वर्ष 1854 मधे त्यांनी पुरातत्त्व अवशेषांच्या आधारावर बौद्ध धर्माचा इतिहास “भिल्सा टॉप्स’ येथे प्रकाशित केला. त्यांनी असंख्य पुस्तके आणि मोनोग्राफ लिहिली आणि कलाकृतींचे विस्तृत संग्रह केले. त्यांचे काही संग्रह हरवले. परंतु बहुतेक सोन्या-चांदीची नाणी आणि बौद्ध शिल्पे आणि दागिने यांचा एक संग्रह 1894 मध्ये ब्रिटीश संग्रहालयास देण्यात आला. 1865 मध्ये त्यांचा पुरातत्त्व विभाग बरखास्त केल्यानंतर कॅनिंगहॅम इंग्लंडला परतले.
वर्ष 1871मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण पुन्हा स्थापित केले आणि लॉर्ड मेयो यांनी 1 जानेवारीला कॅनिंगहॅम यांची महासंचालक म्हणून नेमणूक केली व भारतात ते परत आले. 1872 मध्ये हडप्पा येथे उत्खनन करून सिंधू संस्कृतीचे अवशेष शोधून काढले. 1885 मध्ये निवृत्तीनंतर इंग्लंडला परतले त्यानंतर उर्वरित आयुष्य लेखनात घालविले. लंडन येथे 28 नोव्हेंबर 1893 रोजी निधन झाले.