मुंबई – काही दिवस अरबी समुद्रात रेंगाळलेला मान्सून अखेर पुढे सरकला आहे. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैऋत्य भाग मान्सूनने जवळपास व्यापला आहे. मालदीव आणि कोरोरिन क्षेत्रात मान्सून सक्रीय झाला असून दक्षिण आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा हा प्रवास असाच सुरू राहिल्यास पुढील आठवडाभरात मान्सून राज्याच्या वेशीवर पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
एकीकडे मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरू झालेली असताना देशभरात मान्सूनपूर्व सरी धुमाकूळ घालण्याचा इशारा हवामान खात्याने दिला. हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट दिला. पश्चिमेकडे निर्माण झालेले कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे देशातल्या बहुतेक राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
राज्यातही कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.