प्रा. विजया पंडित
उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्यात विजांचा कडकडाट हा नेहमीच पाहायला मिळतो. अनेकदा वीज पडून जीवितहानी झाल्याच्या दुर्दैवी घटनाही आपल्याकडे घडतात. काही दिवसांपूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेशात एकाच दिवशी विजा कोसळून सुमारे 125 जणांना प्राण गमवावे लागले. भारतात दरवर्षी 2 हजार जणांचा वीज कोसळून मृत्यू होतो. वीज कोसळण्याच्या घटनेची आगाऊ सूचना देण्याची व्यवस्था आपल्याकडे विकसित झालेली नाही, हे कारण आहेच. शिवाय, हरितगृह वायूंचे अत्याधिक उत्सर्जन आणि जलवायू परिवर्तन यामुळेही वीज कोसळण्याच्या घटना वाढत आहेत.
वादळाच्या स्वरूपात ढग एकत्र आल्याने आकाशात वीज निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. बर्फाचे छोटे-छोटे कण आणि आत्यंतिक थंड पाण्याचे थेंब यांचे परस्परांशी घर्षण होते आणि त्यांच्यात परस्परविरोधी ध्रुवांच्या विद्युतकणांचा प्रवाह होतो. तसे पाहायला गेल्यास धन आणि ऋण ध्रुव चुंबकाप्रमाणेच एकमेकांना आकर्षित करतात. परंतु वायू हा विजेचा उत्तम वाहक नसल्याने विजेच्या लहरींमध्ये अडथळा निर्माण होतो.
त्यामुळे ढगांच्या खालच्या ऋणभारित पृष्ठभागाला स्पर्श करू इच्छिणाऱ्या धनभारित लहरी जमिनीवर येऊन कोसळतात; कारण जमीन विजेची सुवाहक आहे. ढगांच्या मधील पृष्ठभागाच्या तुलनेत जमीन अपेक्षेपेक्षा अधिक धनभारित होते. अशा वेळी विजेचा काही प्रवाह जमिनीच्या बाजूला वळतो. भारतात दरवर्षी लोकांचे, गुरेढोरे आणि घरांचेही प्रचंड नुकसान वीज पडल्यामुळे होते.
अमेरिकेत दरवर्षी वीज कोसळून सरासरी 30 व्यक्तींचा मृत्यू होतो तर ब्रिटनमध्ये दरवर्षी 3 जणांना प्राण गमवावा लागतो. भारतात मात्र हा आकडा प्रचंड मोठा आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वीज कोसळण्याच्या घटनेचा अंदाज बांधून इशारा देणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. आकडेवारीवरून असे स्पष्टपणे दिसून येते की, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत वीज कोसळण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडतात आणि सामान्यतः दिवसा घडणाऱ्या घटनांमध्येच लोकांचा बळी जातो. जोराचा पाऊस सुरू असेल आणि विजा कडाडत असतील, तर अशा वेळी शेतातील पाण्यात, झाडाच्या खाली किंवा डोंगराळ भागात जाणे टाळायला हवे. विजा कडाडत असताना मोबाइलचा वापर करणेही घातक ठरू शकते.
एकाच वेळी अनेक ठिकाणी अशा रीतीने विजा पडण्याच्या घटना घडतात, त्याचे मूळ पृथ्वीच्या वाढत्या तापमानात आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. पूर्वी आषाढ महिन्यात देशात अधिक जोरदार पाऊस पडत नसे. परंतु आता कमी वेळात अधिक पाऊस पडण्याच्या घटना आणि श्रावण, भाद्रपद हे महिने कोरडे जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
जलवायू परिवर्तनाचाच हा अटळ परिणाम आहे. समजून घेण्याजोगी बाब अशी की, वीज कोसळणे हाही जलवायू परिवर्तनाचाच परिणाम आहे; शिवाय अशा अधिक घटना घडल्यामुळेही जलवायू परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान होते. वीज कोसळण्याची घटना घडते तेव्हा नायट्रोजन वायू उत्सर्जित होतो आणि हा एक अत्यंत घातक हरितगृह वायू आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
अर्थात, वीज कोसळण्याच्या घटना आणि जलवायू परिवर्तनावर त्याचा थेट परिणाम याविषयी फारसे संशोधन झालेले नाही. परंतु जलवायू परिवर्तनामुळे वीज कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत, ही बाब मात्र काही ठिकाणी संशोधनातून सिद्ध झाली आहे. या क्षेत्रात सखोल संशोधन करण्यासाठी ग्लोबल क्लायमेट ऑब्झर्व्हिंग सिस्टिमच्या शास्त्रज्ञांनी जागतिक हवामानशास्त्र संस्थेच्या सहकार्याने विशेष संशोधन पथकाची स्थापना केली आहे. परंतु जलवायू संशोधनाच्या बाबतीत केलेल्या संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, जलवायूमध्ये अधिक उष्णता निर्माण झाली तर गडगडणारी वादळे कमी आणि वेगवान वादळे अधिक प्रमाणात येतील. पृथ्वीचे तापमान एका अंशाने वाढले तरी आकाशातून वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये दहा टक्क्यांनी वाढ होईल, असे हे संशोधन सांगते.
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कले येथील संशोधकांनी वायुमंडलावर परिणाम करणारे घटक आणि वीज कोसळण्याच्या घटनांमधील संबंध जाणून घेण्यासाठी एक संशोधन मे 2018 मध्ये सुरू केले होते. त्यांचा निष्कर्ष असा होता की, आकाशात वीज तयार करण्यासाठी दोन प्रमुख घटकांची आवश्यकता असते ः घन, द्रव आणि वायू अशा तीनही अवस्थेत पाणी आणि बर्फ तयार होण्याची प्रक्रिया रोखणारे दाट ढग. शास्त्रज्ञांनी जलवायूच्या 11 मॉडेलवर प्रयोग केले आणि त्यांना असे आढळून आले की, भविष्यात हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होणे शक्य नाही. त्यामुळे आकाशातून वीज जमिनीवर कोसळण्याच्या घटना यापुढे वाढतच जातील.
लक्षात घेण्याजोगी आणखी एक गोष्ट अशी की, आता ज्या भागांमध्ये वीज कोसळली आहे, त्यातील बहुतांश भाग भाताच्या उत्पादनाचा आहे आणि जेथे भातपिकासाठी पाणी शेतात साठवून ठेवले जाते अशा ठिकाणी मिथेनसारख्या घातक हरितगृह वायूंचे उत्सर्जन अधिक प्रमाणात होते. वातावरण जितके अधिक उष्ण असेल, हरितगृह वायूंचे उत्सर्जन जितके अधिक असेल, तितक्या वेगाने आणि ताकदीने वीज जमिनीवर कोसळेल.
अर्थातच, हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावर नियंत्रण आणले आणि जलवायू परिवर्तनाची परिस्थिती मर्यादित ठेवली तर सागरी चक्रीवादळे, विजा कोसळणे, ढगफुटी अशा भयावह संकटांची तीव्रताही कमी होणार आहे.