ग्राहक व दुकानदारांना पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना
गुवाहाटी : आसाम आणि मेघालय या उत्तर पूर्वेतील राज्यांमध्ये सोमवारपासून मर्यादित कालावधीमध्ये मद्यविक्री सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने देशपातळीवर सुरू केलेले लॉक डाऊन मंगळवारी संपुष्टात येणार आहे. आसाम आणि मेघालय मधील सर्व राजकीय पक्षांनी मद्य विक्रीवरील बंदी उठविण्याची मागणी केल्यानंतर या दोन्ही राज्यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. दोन्ही राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागाने राज्यांच्यातील दुकानदारांना या संबंधात माहिती दिली आहे. आसाममध्ये घाऊक आणि किरकोळ विक्री सुरू झाली आहे.
त्याचबरोबर मद्य उत्पादनही सुरू झाले आहे. या राज्यांमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या सात आठ तासात मद्य विक्री करता येईल. मात्र दुकानदारांनी कमीत कमी कर्मचारी कामावर ठेवावेत. कर्मचारी आणि ग्राहकांना हॅंड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा अशा दुकानदारावर कडक कारवाई करण्यात येईल असे आसाम सरकारने सांगितले आहे. आसाममध्ये करोना व्हायरसचा 29 लोकांना संसर्ग झालेला आहे तर एक व्यक्ती मृत्यू पावला आहे.
मेघालयातील मद्य विक्री सकाळी नऊ ते सायंकाळी चार या कालावधीत सुरू राहणार आहे. या राज्याने दुकानदारांना आणि ग्राहकांना पुरेशी काळजी घ्यावी असे सांगितले आहे. मेघालयामध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीला करोना व्हायरसचा संसर्ग झालेला नाही. दक्षिणेतील केरळ सारख्या काही राज्यांनीही मद्य विक्रीवरील बंधने शिथिल करण्यासाठी प्रयत्न केले होते. काही जणांना डॉक्टरांनी सांगितल्यावर मद्य विक्री करण्याची परवानगी दिली होती. मात्र केरळ उच्च न्यायालयाने ही परवानगी रद्द केलेली आहे.
आसाम आणि मेघालय या राज्यांनी मद्यविक्रीवरील वरील बंदी काढून टाकल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हे जम्मू-काश्मीरमध्ये मद्य विक्रीला परवानगी देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, लॉका डाऊन जास्त कडक करण्याची गरज नाही. या कालावधीत मद्य विक्री सुरू राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याबाबत जम्मू-काश्मीर प्रशासनाने कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.