पुणे – गाण्याच्या रियाजाप्रमाणे आवाजाचा रियाज असतो. गायनाप्रमाणे गद्य बोलण्यालाही पट्टी असते. वेगवेगळ्या पद्धतीने आवाज फिरवण्यासाठी रियाज लागतो. मुलांनी ऐकले पाहिजे यासाठी शिक्षक जे काही करतात, तोच विचार ही भूमिका करताना मनात होता. “अलबत्या गलबत्या’ ही सामाजिक चळवळ झाली आहे. हे नाटक मोठ्यांना आवडले नसते तर ते मुलांना घेऊन आलेच नसते. प्रेक्षकांची दाद मिळणे हेच मोठे आहे. त्यामुळे दखल घेतली नाही याची खंत वाटत नाही, असे मत अभिनेते वैभव मांगले यांनी व्यक्त केले. मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
“अलबत्या गलबत्या’ या नाटकाने 375 दिवसांमध्ये 333 प्रयोग सादर केले. यानिमित्ताने अभिनेते वैभव मांगले यांच्या मुलाखतीचे आयोजन संवाद संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. मांगले यांची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. यावेळी संवादचे सुनील महाजन, निकिता मोघे आणि बालरंगभूमी परिषद शिरूर शाखेच्या दीपाली शेळके आदी उपस्थित होते.
सध्या चांगले बालनाट्य रंगभूमीवर पाहायला मिळत नाही, हे वास्तव आहे. वाडा चिरेबंदी या नाटकानंतर या नाटकाचा प्रस्ताव आला. तेव्हा दोन्ही भूमिकांची तुलना होईल ही भीती अजिबात नव्हती. त्यामुळे ही संधी सोडली असती, तर मीच करंटा ठरलो असतो, असे नाटकाबाबत सांगताना मांगले म्हणाले.
कलाकाराला साहित्याची जाण असणे महत्त्वाचे आहे. लेखकाने लिहिलेले शब्द वाचताना कलाकाराच्या मनात व्यक्तिरेखा आणि चित्रपट उभा राहतो. शब्दांचा अर्थ पोहोचवताना निरीक्षणशक्ती उपयोगी पडते, असे मांगले यांनी नमूद केले. आगामी दोन वर्षांत एक हजार प्रयोग करणार आहे. मुलांसाठी सात-आठ कथांचे वाचन करेन, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी मांगले यांनी “अंतू बरवा’चा प्रवेश सादर केला. सूत्रसंचालन रेणूका भिडे यांनी केले. तर निकिता मोघे यांनी आभार मानले.
आपल्याकडे मुले हा सर्वात दुर्लक्षित घटक झाला आहे. त्यांना खेळण्यासाठी चांगली उद्याने, मैदाने सध्या दिसत नाहीत. पालक मुलांना गोष्टी सांगत नाहीत. गाणी म्हणून दाखवत नाहीत. पण हे सर्व दाखविणे गरजेचे असून बालनाट्यांमुळे मुलांचे केवळ मनोरंजन होत नाही, तर त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होते.
– वैभव मांगले, अभिनेता