आळंदी (एम.डी. पाखरे/ ज्ञानेश्वर फड) – कैवल्याचा पुतळा। प्रगटला भूतला। चैतन्याचा जिव्हाळा। ज्ञानोबा माझा।। हाच मनात भाव धरून वर्षानुवर्ष संजीवन समाधी सोहळ्याला उपस्थित रहात कृतकृत्य होणाऱ्या भागवत धर्मियांनी अलंकापूरी शनिवारी पुन्हा गजबजून गेली. माऊलींच्या नामघोषाचा जयघोष ऐकून जणू इंद्रायणीही धन्य झाली. या अनुपम सोहळ्याला एस. टी. संप आणि करोना साथीचे संकट असली विघ्ने पार करत हजारो वारकरी आज आळंदीत दाखल झाले.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्याची शनिवारी श्रीगुरू हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात सुरुवात झाली. पहाटे घंटानाद, पवमान अभिषेकानंतर सकाळी नऊ वाजता हैबतबाबांचे वंशज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर-पवार, राजेंद्र आरफळकर यांच्या हस्ते पायरी पूजन झाले. दरम्यान, या सोहळ्यासाठी पंढरपूरहून श्री विठ्ठल, भक्त पुंडलिकराय, संत नामदेव यांसह राज्यातील इतरही भागातून अनेक संतांचे पालखी सोहळे आळंदीत दाखल झाले आहे. धर्मशाळा, वारकरी आश्रम, संस्थांमध्ये हरिनाम सप्ताह सुरु झाले असून हरिनामाचा गजराच्या पावित्र्याने वातावरण भारावून गेले आहे.
पायरीची सजावट पवार कुटुंबीयांनी केली. तर पूजेचे पौरोहित्य श्रीनिवास कुलकर्णी, अमोल गांधी, श्रीरंग तुर्की यांनी केले. पूजेनंतर दिंडीची मंदिर प्रदक्षिणा झाली. यावेळी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक, ऍड. विकास ढगे पाटील, मुख्याधिकारी अंकुश जाधव, बीडीओ अभय जोशी, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, मानकरी योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरू, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, राजाभाऊ रंधवे, भीमराव गुंडरे, आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलिस नाईक मछिंद्र शेंडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, अजित वडगावकर, संतोष गावडे, विष्णु तापकीर, ज्ञानेश्वर गुळुंजकर, माऊली दिघे, विठ्ठल घुंडरे, प्रसाद बोराटे, आळंदीकर ग्रामस्थ आणि वारकरी भाविक उपस्थित होते.
“माऊलींचा 725वा समाधी सोहळा आहे. करोना संसर्ग, एसटी संप, यामुळे ज्या भाविकांना सोहळ्याला येता आले नाही त्यांच्यासाठी माऊली देवस्थानकडून ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे. तसेच मंदिरात होणारे सर्व कार्यक्रम ऑनलाईन दाखवले जात आहे. भाविकांनी या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन घरबसल्या या सोहळ्यात सहभागी व्हावे.
– योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी
“हैबतबाबांच्या पायरीपूजनाने कार्तिकी वारीची सुरुवात झाली आहे. मंदिरात दररोज परंपरेचे कार्यक्रम पूजा, भजन, कीर्तन, हरिजागराचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. 30 तारखेला एकादशी दिवशी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत दाखल होणार आहेत. मंदिर संस्थानसह आळंदी प्रशासनाने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व व्यवस्था केली आहे. 2 डिसेंबरला त्रयोदशी दिवशी माऊलींचा 725वा समाधी सोहळा होणार आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून सोहळा साजरा करावा, असे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ऍड. विकास ढगे यांनी सांगितले.
“संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी या सोहळ्याचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले. ते म्हणाले, 2020 हे नामदेवराय यांच्या अवताराचे सप्तशतकोत्तरसुवर्णमहोत्सवी वर्ष, 2021 हे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे सप्तशतकोत्तररौप्यमहोत्सवी वर्ष आणि 2022 हे संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताई, योगी चांगदेव महाराज या चार महात्म्यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवाचे प्रारंभ वर्ष असल्याने हे तिनही वर्ष वारकरी, भाविकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. माऊलींच्या कार्याचा महिमा अगाध आहे. संत नामदेवराय यांनी समाधी वर्णन आणि समाधी प्रसंगाच्या अभंगातून माऊलींचा महिमा वर्णन केलेला आहे. या अनुपम सोहळ्यचा अलंकापूरीत आलेल्या भाविकांनी नियमांचे पालन करून आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.