आळंदी (एम.डी. पाखरे/ ज्ञानेश्वर फड) – चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहु।। होतील संतांच्या भेटी। सांगू सुखाच्या गोष्टी।। हे संतवचन प्रत्यक्षात जगत 725व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र अलंकापुरीत वारकरी भाविक दाखल होत आहेत. टाळ, मृदंग, खांद्यावर भगवी पताका घेऊन भागवतधर्मीय विठूनामाचा आणि ज्ञानोबा माऊली नावाचा अखंड जयघोष करत आहेत. ऊद्यापासून (दि. 27) श्रीगुरू हैबतबाबा यांच्या पायरी पुजनाने संजीवन समाधी सोहळ्यास सुरुवात होत आहे.
या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक येत असून आळंदी पंचक्रोषित हरिनामाचा गरज होत आहे. करोनामुळे आलेल्या खंडानंतर पहिल्यांदाच यात्रा होत असल्याने वारकरी, आळंदीकर ग्रामस्थ, व्यावसायिक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान माऊली देवस्थानसह नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यात्रेकरूंना कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही, 24 तास सेवा सुविधा मिळतील अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यानिमित्त आळंदीत सर्व धर्मशाळा, वारकरी आश्रम, संस्था यांमध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हरिनामाने आळंदी दुमदुमत असल्याचे चित्र आहे.
भाविकांच्या सेवेसाठी आळंदी नगरपरिषद सज्ज
“भाविकांच्या सेवेसाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज आहे. दर्शनबारी व्यवस्था, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अधिकच्या पाण्यासाठी पंपींग स्टेशनची क्षमता वाढवली असून टॅंकरचीही व्यवस्था केली आहे. फिरते टॉयलेट बसवण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी एसडीएमचे पथक तैनात असेल. शहरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पब्लिक अनाउंसिंग सिस्टीम बसवण्यात आले आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून सोहळा उत्साहात साजरा करावा.” – अंकुश जाधव (मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद)
– पोलिस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त
“पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली 160 पोलिस अधिकारी, 1200 कर्मचारी, 700 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात आहेत. तसेच वायरलेस यंत्रणा, डॉग स्कॉड, पोलिस मित्र, एनजीओ, यांची मदत घेणार आहोत. सहा ठिकाणी नाकाबंदी पॉइंट्स, आठ पोलिस मदत केंद्र आहेत. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करून सोहळा साजरा करावा.” – ज्ञानेश्वर साबळे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आळंदी पोलीस स्टेशन)
– आरोग्य यंत्रणा सज्ज
“रविवारपासून आळंदी ग्रामीण रूग्णालय ओपीडी आणि आंतररूग्ण सेवा 24 तास सुरु ठेवण्यात येणार आहे. यात्राकाळात पंचक्रोशीतील नागरिकांसाठी आणि भाविकांसाठी पाच ठिकाणी बुथ उभारण्यात आले असून येथे डॉक्टर, फार्मासिस्ट, सिस्टर्स, तसेच अँटीजेन टेस्टिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदीकडे येणाऱ्या रस्त्यांवरही तपासणी पथक तैनात आहे. 5 रुग्णवाहिका, 24 तास आरोग्य सेवा सुरु राहील. डॉक्टर, नर्सेस, लॅब टेक्निशअन, कर्मचारी यांना पाचारण करण्यात आले आहे. यात्राकाळातही लसीकरण सुरु असणार आहे. भाविक पॉझिटीव्ह आढळल्यास रुग्णालयात उपचारासाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्यात आला आहे.” – डॉ. जी.जी. जाधव (वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय आळंदी)
दरम्यान, आजपासून (कार्तिक वद्य अष्टमी) माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास सुरुवात होत आहे. त्यानिमित्त मंदिरात पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 7 ते 9 ह.भ.प. बाळासाहेब पवार, हैबतरावबाबा वंशजप्रतिनिधी यांच्यातर्फे वै.गु. हैबतबाबांच्या पायरीची पूजा. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य, 6.30 ते 8 ह.भ.प. योगिराज ठाकूर यांच्यातर्फे वीणा मंडपात कीर्तन सेवा. रात्री 8 ते 8.30 धुपराती. रात्री 9 ते 11 ह.भ.प. बाबासाहेब आजरेकर यांच्यतर्फे वीणा मंडपात कीर्तन सेवा. रात्री 10 ते 12 ह.भ.प. वासकर महाराज यांच्यातर्फे हैबतबाबांच्या पायरीपुढे जागर, रात्री 12ते 2 ह.भ.प. मारुतीबुवा कराडकर यांच्यातर्फे हैबतबाबांच्या पायरीपुढे जागर, रात्री 2 ते 4 जागर कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली आहे.