आळंदी – आळंदी नियमित मुक्कामी असणारी कंधार- आळंदी (एमएच 20 बीएल 3719) या एसटी बसला बुधवारी (दि. 17) मध्यरात्री अचानक आग आगल्याने बस जळून खाक झाली. अनिशामक दलाच्या जवानांनी बसमधील वाहक-चालकास खिडकीची काच फोडून बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला. दरम्यान, ही आग कोणी लावली की लागली याबाबत तपास सुरू करण्यात आल्या आहे. घटना मध्यरात्री घडल्याने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
कंधार-आळंदी ही नियमित आळंदी मुक्कामी असणारी एसटी बस बुधवारी रात्री उशीरा आळंदी बस स्थानकावर पोहोचली. रात्री वाहक-चालक नेहमी प्रमाणे जेवण वगैरे उरकून पुढील सिटवर झोपले मात्र, मध्यरात्री दोनच्या सुमारास बसने अचानक मागील बाजूने पेट घेतल्याचे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालक व पादचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर आळंदी अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. अग्निशमकदलाच्या जवांनी तात्काळ ही आग विझवली मात्र, तोपर्यंत बस अर्धीअधिक जळून खाक झाली होती, अशी माहिती अग्निशामकदलाचे प्रमुख विलास पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत इतर चार कर्मचाऱ्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.
बसने पाठीमागून पेट घेतल्याने मागील चारही टायर , सर्व बसण्याची आसने व इतर साहित्य जळून खाक झाले आहेत. बसला समाज कंटकांनी आग लावली? की, लागली? हे अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे शिवाजीनगर एसटी बस डेपोतील अधिकारी वर्गाने सांगितले. रितसर पंचनामा करण्यात आला असून, बस जळून खाक झाल्याने सुमारे 15 लाखांचे महामंडळाचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास दिघी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.