आळंदी- गेल्या तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे इंद्रायणी नदीला गुरुवारी पहाटे महापूर आला. त्यामुळे इंद्रायणीत असणारे भक्त पुंडलिक मंदिर, भक्ती सोपान पूल, विविध संतांच्या समाध्या (पादुका) तसेच इंद्रायणी कडे जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले. इंद्रायणीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस स्टेशन तसेच महसूल विभाग यांनी आपापली कामे करण्यास सुरुवात केली आहे. आळंदी नगर पालिके मार्फत आपत्ती व्यवस्थापन कक्ष अग्निशामन दल, पोलीस प्रशासनाच्या वतीने इंद्रायणीकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत.
महसूल विभागामार्फत नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथील शनी मारुती मंदिर तसेच इंद्रायणी घाट पोलीस चौकी पाण्याखाली गेली असून नियमित होणारी नागरिक व भाविकांची नगर प्रदक्षिणा बंद झाली आहे. तर, सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती.