आळंदी – गेल्या सहा दिवसांपासून मावळ पट्ट्यासह खेडच्या पूर्व-पश्चिम भागात वरुणराजा दमदार कोसळत असल्याने इंद्रायणी नदीला पूर आला आहे. नदीने सध्या धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदीतील पीसीएमटी बसस्टॉपजवळील जुना पूल वाहतुकीसाठी पोलीस प्रशासनाने बंद केला आहे. तर या जुन्या पुलानजीकच्या नवीन पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक वळविण्यात आली आहे.
नदीकाठच्या दोन्ही बाजूने वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काठाजवळ पाण्याची पातळी वाढ होत असताना आपण योग्य वेळी आपला मुक्काम पर्यायी जागेत हलवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पावसामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, अत्यावश्यक सेवेसाठीच नागरिक कामानिमित्त बाहेर पडत आहेत.