आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा शुक्रवारी (2 जुलै) होणार असून, यासाठी मोजक्याच निमंत्रितांना आमंत्रित करण्यात आल्याचे पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करून ही वारी आधार वारी म्हणून साजरी करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तमाम वारकरी बांधवांना केले आहे. माऊलींचा धार्मिक परंपरेचा हा सोहळा नेत्र सुखात साठवण्यासाठी स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था प्रशासनाच्या तसेच देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
श्रीगुरू हैबतरावबाबा यांचे तर्फे श्रींची आरती, संस्थानतर्फे श्रींची आरती, प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप, वीणआमंडपात श्रींच्या चल पादुका आणल्या जातील. त्यानंतर संस्थानतर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप होईल. श्रीगुरू हैबतरावबाबा तर्फे प्रातिनिधीत दिंडीप्रमुख, प्रतिष्ठित, मानकरी यांना प्रसाद वाटप होईल. पादुकांचे वीणामंडपातून प्रस्थान व मंदिर प्रदक्षिणा करून दर्शनमंडप हॉलमध्ये विराजमान होतील. त्यानंतर समाज आरती होईल.
दरम्यान, प्रस्थानानंतर दि. 3 ते 19 जुलै पर्यंत पालखी सोहळा आळंदीतच माऊलींच्या आजोळघरी असेल. 19 जुलैला माऊलींच्या चलपादुका सकाळी 10 वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ होतील.