आळंदी – वैकुंठ एकादशीच्या पवित्र सणानिमित्त लक्ष्मीनगर येथील गणेश महाराज फड वारकरी आश्रमात तुळशीमाता आणि शालिग्राम भगवान यांचा विवाहसोहळा पार पाडला. यावेळी परिसरातील पन्नासहून अधिक महिलांनी एकत्र येऊन सोहळा साजरा केला. तुळसी विवाह सोहळ्यानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण होते.
दरम्यान, महिलांनी तीन दिवसांपासून या उत्सवाची तयारी केली होती. दोन दिवस आधी हळद दळली, विवाह दिवशी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बोरुडे यांनी तुळसी विवाहाचे महात्म्य सांगितले. त्यानंतर थाटामाटात लग्न लावले. तुळसीची आरती होऊन पसायदानाने विवाह सोहळ्याची सांगता झाली. यावेळी विश्रांतीवड परिसरातील महिला, पुरुष, लहान मुलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. देवाच्या लग्नाला आलेल्या सर्व वऱ्हाडीना महिलांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. ज्ञानाई महिला मंडळाने सोहळ्याचे आयोजन केले होते.