नवी दिल्ली : भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याने आता भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे दिसत आहे. कारण याच मुद्द्यावरून आता अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारतामध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे.
अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेने गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी तयार असल्याचे दहशतवादी संघटनेने म्हटले आहे. संघटनेने यासाठी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकामध्ये ‘भगवे दहशतवादी’ असा उल्लेख करत भारतीयांनी दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये होणाऱ्या हल्ल्यासाठी तयार रहा असा इशारादेखील देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. “त्यांना ना त्यांच्या घरात आश्रय मिळणार, ना त्यांच्या सैन्य छावण्यांमध्ये” असा उल्लेख करत आत्मघाती हल्ला करणार असल्याचा इशारा या संघटनेने दिला आहे.
“जे आपल्या प्रेषितांचा अपमान करतात आपण त्यांना ठार मारलं पाहिजे. जे आपल्या प्रेषितांबद्दल अपशब्द वापरतात त्यांना उडवून लावण्यासाठी आपण स्वत:बरोबरच स्वत:च्या मुलांच्या अंगावरही स्फोटके बांधून हल्ला केला पाहिजे. त्यांना यासाठी कोणतीही माफी मिळणार नाही, कोणतीही शांतता आणि सुरक्षा त्यांना वाचवू शकणार नाही. हे प्रकरण निंदा किंवा दुःखाच्या कोणत्याही शब्दांनी शांत होणारं नाहीय,” असेही या संघटनेने म्हटले आहे.
या पत्रामध्ये भाजपाच्या सत्तेचा उल्लेख ‘भारतावर ताबा मिळवलेले हिंदू दहशतवादी’ असा केलाय. प्रेषितांच्या सन्मानासाठी या युद्धामध्ये सहभागी होण्याचं आवाहन या दहशतवादी संघटनेनं इतरांना करताना. या युद्धात प्राण गमावले तरी हरकत नाही असे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाच्या धोरणांच्याविरोधात भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत नुपूर यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.