सेलिब्रेटींना भुरळ; शिळींबच्या झोपडीत खाल्ली “गुळ भाकर’
पवनानगर – वेळ सकाळी साडेआठची… ठिकाण पवन मावळातील शिळींबची शिंदेवाडी… एक व्यक्ती मोटारीतून उतरून झोपडीच्या दारात येऊन पाणी मागतो… झोपडीतील ज्येष्ठ दाम्पत्य त्या चुमरडीला पाणी, तर देतातच. पण दोघांनाही घरात बोलावून त्यांना चहा आणि गुळ भाकर खाण्यासाठी देतात… त्यानंतर तो व्यक्ती त्यांना आपली ओळख करून देतो… दारात आलेला तो व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नव्हे; तर तो होता बॉलीवूडस्टार अक्षय कुमार. झोपडीत राहणाऱ्या “त्या’ मावळकरांनी केलेल्या प्रेमळ पाहुणचाराने अक्षयकुमारही भारावून गेला.
मावळ तालुक्यातील शिळींब गावाच्या परिसरात हिलटन हॉटेल्समध्ये सुटीच्या काळात अनेक सेलेब्रिटी, राजकीय व्यक्ती, परदेशी पर्यटक पर्यटनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर, कोराईगडच्या कुशीत असलेले हे पवना धरणाचे पाणलोट क्षेत्र पर्यटकांना मोहिनी घालते. दिवाळी सुटीच्या निमित्ताने बॉलीवूडचा स्टार अभिनेता अक्षयकुमार या परिसरात हजेरी लावली.
सकाळी मोटारीने अक्षयकुमार निसर्गाचे अनोखे रूप न्याहाळत चालला होता. पवन मावळ परिसरात फिरताना अक्षयकुमारच्या समवेत त्याची छोटी मुलगी नितारा होती. निताराला तहान लागली. मात्र परिसरात दुकान नसल्याने पाणी मिळत नव्हते. त्यामुळे शेवटी तो शिळींब गावातील शिंदेवाडीत एका झोपडीसमोर थांबला. मोटारीतून उतरून तो मुलीला घेऊन तेथील झोपडीजवळ गेला. तेथे बबन ढमाले आणि त्यांची पत्नी द्रोपदा हे ज्येष्ठ दाम्पत्य होते.
द्रोपदा यांना अक्षयकुमार यांनी मुलीसाठी पाणी देण्याची विनंती केली. त्यावेळी ढमाले दाम्पत्यानी त्यांना झोपडीत बोलावले. त्यांना बसायला टाकले. त्यांनी दोघांना पाणी दिले. तसेच चहा आणि घरात बनविलेले गुळ भाकर खायला दिले. त्यावेळी घरात आलेला व्यक्ती कोण आहेत, याची पुसटशीही कल्पना ढमाले दाम्पत्याला नव्हती. पण आपल्या दारात आलेल्या पाहुण्याला आदराची वागणूक देवून आपल्याकडे आहे, तसा पाहुणचार करण्याची ग्रामीण भागात परंपरा आहे. त्यानुसार त्यांनी पाहुणचार केला. या मावळच्या माणुसकीने अक्षय देखील भारावला.