मुंबई – महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. भंडारा येथे बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
नाना पटोले म्हणाले की, पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार टि्वटरच्या माध्यमातून टिव टिव करायचे. सरकारवर ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे, असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी म्हणाले की, केंद्रसरकारच्या देशविरोधी धोरणांच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडावी.
लोकशाहीच्या मार्गाने जसं आधी मनमोहन सिंह सरकारच्या काळात त्यांनी भूमिका मांडली, तशीच आताही भूमिका मांडावी, जर त्यांनी भूमिका नाही मांडली तर त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.
युपीएच्या काळात इंधनाचे दर ७० रु झाल्यावर टीव टीव करणारे @SrBachchan, @akshaykumar आज पेट्रोलचे दर १०० रु. झाल्यावरही गप्प का आहेत? सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या मोदी सरकारविरोधात गप्प असणाऱ्या या सेलिब्रिटींच्या पिक्चरचे शुटींग महाराष्ट्रात होऊ देणार नाही.. pic.twitter.com/PEmirXQIe6
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 18, 2021
नाना पटोले यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील स्वागत केलं आहे. ‘देशातील प्रश्नावर बोलण्याचा अधिकार अक्षय कुमारला नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तसेच अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशी टीका मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. एवढेच नाही तर अमिताभ बच्चन यांना मेमरी लाॅस झाला आहे का? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.