मुंबई – जागतिक क्रिकेटमधील कोणता गोलंदाज तुला सर्वाधिक आवडतो व कोणत्या गोलंदाजाचे दडपण सर्वाधिक आले असते, या प्रश्नावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी कर्णधार व वेगवान गोलंदाज वसिम अक्रम याचे नाव घेतले. मला अक्रम यांची गोलंदाजी खेळावी लागली नाही हे नशीब समजतो, त्यांच्या गोलंदाजीसमोर फलंदाजी करणे मला निश्चितच जड गेले असते, असेही कोहलीने सांगितले.
जागतिक क्रिकेटमध्ये अनेक संघांचे अनेक गोलंदाज खरोखरच महान होते. त्यांच्यासमोर फलंदाजी करणे कठीणही गेले असते. मात्र, त्यातही अक्रम यांची गोलंदाजी खेळणे जास्त तणावपूर्ण ठरले असते. केवळ ते डावखुरे वेगवान गोलंदाज होते म्हणून नव्हे तर त्यांच्याकडे प्रत्येक फलंदाजाला बाद करण्याची व त्याचे कमकुवत दुवे हेरून त्यानुसार गोलंदाजी करण्याची क्षमता होती.
त्यांची कामगिरी अनेकदा पाहिली आहे. अक्रम हे समोरच्या फलंदाजाला गोलंदाजीचे आकलनच होणार नाही व स्विंगचाही अंदाज येणार नाही, अशी गोलंदाजी करायचे. त्यामुळे त्यांच्या समोर खेळणे निश्चितच जड गेले असते, असेही कोहली म्हणाला.
कोहली सध्या मुंबईच्या हॉटेलमध्ये विलगीकरणात राहात आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ विलगीकरण व करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करत आहे. जून महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमध्ये येत्या 18 ते 22 जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिकाही होणार आहे.