अकोला – राज्यात तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विदर्भात सर्वाधीक तापमानाची नोंद झाली आहे. असे असताना अकोल्याच एका शेतकऱ्याचा उष्मघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकोला शहरातील तापमाना कमालीची वाढ झाली आहे. शहरातील तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियसच्यावर पोहोचला आहे. अकोला हे देशातील दुसऱ्या तर जगातील नवव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. जिल्ह्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी आहे.
समाधान शिंदे, वय 50 असे या शेतकऱ्याचे नाव असून ते जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात येत असलेल्या सारकिन्ही या गावातील रहिवासी होते. शेतात काम करताना समाधान शिंदे हे चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, विदर्भात तापमान चांगलेच वाढले आहे. असे असताना कालपासून पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे. यासंदर्भात हवामान विभागाने अलर्ट जारी केला होता. विदर्भातील तापमान या चार दिवसांत 42 अंशाच्याही वर जाणार असल्याचे शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होते. त्यामुळे विदर्भात आणखी तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उष्माघातापासून बचाव व उपायासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.