Gas Shortage : अकोला जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅससाठी रांगेत उभे असताना अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सी येथे सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी रांगेत उभे होते. उन्हाचा तडाखा आणि लांब प्रतीक्षा यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जागीच कोसळले. त्यांना तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून, गॅस वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गॅस सिलेंडरसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, अपुरी व्यवस्था आणि नियोजनाचा अभाव यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. शिरसाट यांच्या निधनामुळे अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेवरून वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. गॅस तुटवड्याची पूर्वकल्पना असूनही शासनाने योग्य नियोजन केले नाही, असा आरोप त्यांनी केला. वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर हा जीव वाचला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर येथे गॅस तुटवड्याच्या अफवांमुळे पोलिस आणि रेशनिंग विभागाने गॅस एजन्सींवर अचानक पाहणी केली. तर भिवंडी येथे गॅस लायटर कंपनीला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले असून काही जनावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकूणच, राज्यभरात गॅस पुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.