शहराला तब्बल 22 दिवसांतून एकदाच होतोय पाणीपुरवठा
सोलापूर : स्वामी समर्थांची अक्कलकोट नगरी आजही तहानलेलीच आहे. या ठिकाणी तब्बल 20 ते 22 दिवसांतून एकदाच नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे अक्क्लकोटवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. समर्थ नगरीत स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनासुद्धा दुकानातून पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.
अक्कलकोट शहराची लोकसंख्या साधारणपणे 55 ते 60 हजार इतकी आहे. तर दररोज स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्यासुध्दा अधिक आहे. शहराला उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्याच्या झळा बसल्याच. मात्र पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीसुद्धा पाण्याची टंचाई भासत आहे.
अक्कलकोटला पाणीपुरवठा करणारे कुरनूर धरण कोरडे ठाक पडले आहे. त्यामुळे शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पाणीटंचाईवर मत करण्यात नगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपला सपशेल अपयश आले आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीत गुंतले असून नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेकडून अक्कलकोटवासीयांना पिण्याचे पाणी देण्याबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याचे दिसून आल्यानंतर तालुक्यातील आचेगाव येथील जय हिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख यांनी स्वखर्चातून सुरुवातीला पाच टॅंकर सुरु केले. त्यावरसुद्धा नागरिकांची तहान भागत नसल्याने टॅंकर वाढवून आज त्यांची संख्या 25वर गेली आहे. शहराला वारंवार पाणीटंचाई जाणवत असतानासुद्धा नगरपालिकेने मात्र हिळ्ळी ते अक्कलकोट हि जलवाहिनी अद्याप दुरुस्त केली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.