लखनौ – उत्तरप्रदेशातील पोटनिवडणुकीचा निकाल स्वत:साठी अनुकूल ठरावा यासाठी सत्तारूढ भाजपने गैरमार्गांचा अवलंब केला. त्याचा तपशील निकालानंतर देऊ आणि भाजपचे कारनामे उघड करू, असा इशारा समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी दिला.
उत्तरप्रदेशात विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी अखिलेश यांनी भाजपला लक्ष्य केले. भाजपने पोटनिवडणुकीत गैरप्रकार केले. प्रशासनचा गैरवापर केला.
अनेक मतदार मतदानासाठी बाहेर पडू शकणार नाहीत अशी व्यवस्था राज्य सरकारने केली, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. नोटाबंदीच्या मुद्द्यावरूनही अखिलेश यांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपवर टीकेची झोड उठवली.
देशाची अर्थव्यवस्था घसरणीस लागण्यासाठी भाजप जबाबदार आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था अजूनही रूळांवर येऊ शकलेली नाही. ज्यांच्याकडे काळा पैसा होता; ते देश सोडून गेले. मात्र, ज्यांच्याकडे काळा पैसा नव्हता; त्यांना सर्वांधिक फटका बसला, असा दावा त्यांनी केला.