लखनौ: करोना बाधित रुग्णांनी विलगीकरण कक्षामध्ये आपल्याबरोबर मोबाईल फोन नेऊ नयेत, या उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी टीका केली आहे. हॉस्पिटलमधील गैरव्यवस्थापन उघडे पडू नये यासाठीच हा आदेश दिला गेला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
विलगीकरण कक्षामध्ये ठेवले असताना मोबाईल फोनमुळे थोडा मानसिक आधार प्राप्त होतो. मात्र फोन बरोबर घेऊन जाण्याने विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, हे कारण देऊन उत्तर प्रदेश सरकारने आपले गैरव्यवस्थापन लपवण्याचाच प्रयत्न केला आहे. मोबाईल फोन बरोबर नेल्यामुळे संसर्गाचा फैलाव होत नाही. मोबाईल फोन निर्जंतुकीकरण केल्यावर तसा धोका राहणार नाही, असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात ज्या विलगीकरण कक्षामध्ये रुग्णांना ठेवले जात आहे, तेथील वॉर्ड प्रमुखांकडे रुग्णांचे मोबाईल फोन जमा करण्यात येत आहेत. रुग्णाला जर नातेवाईकांशी संपर्क साधायचा असल्यास वॉर्ड प्रमुखाकडून मोबाईल ताब्यात घेऊन बोलणे झाल्यावर पुन्हा मोबाईल वॉर्ड प्रमुखांकडे जमा करण्यात येत आहेत. विलगीकरण कक्षामध्ये संसर्ग फैलावू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश देण्यात आले आहेत.