औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण हिंदुत्व आणि मशिदींवरील भोंग्यांवरून चांगलच ढवळून निघत आहे. त्यातच आता एमआयएमने एन्ट्री घेतली आहे. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद येथील खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाले. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणात तापणार असं चित्र दिसत आहे.
आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासोबत यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, आमदार वारिस पठाण उपस्थित होते. या घटनेनंतर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ओवेसींच्या कृतीवर कडाडून टीका केली आहे.
खासदार जलील यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मुस्लीम धर्मानुसार तुम्हाला जिथे कबर दिसेल, तिथे उभा राहून दर्शन घ्यावं लागतं. आता खुलताबादेत अनेक महापुरुषांचे दर्गा आहेत. शिवाय खुलताबादला गेल्यानंतर कोणीही औरंगजेबाच्या कबरीवर जातोच. यात वेगळा अर्थ काढण्याचं कारण नसल्याचं जलील यांनी म्हटलं.
दरम्यान हिंदू धर्म नष्ट करण्याचं औरंगजेबाचं स्वप्न होते. तो अतिशय दुष्ट राजा होता. त्यामुळेच मुस्लीम धर्मातील लोक त्यांच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवत नाही. तिथल्या अन्य दर्गावर लोक जातात, त्या दर्गा वेगळ्या आहेत. परंतु औरंगजेबाच्या कबरीवर कोणीच जात नाही. एमआयएमचे लोक तिथे जाऊन आले असून यातून नवीन काहीतरी राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश दिसतो, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.