आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाचे आकाश चोप्राचे आवाहन
नवी दिल्ली – करोनाचे सावट असतानाही मी आयपीएल व्हावी या मताचा आहे, कारण ही केवळ एक स्पर्धा राहिलेली नाही तर अनेकांचे आयुष्य त्यावर अवलंबून आहे. स्पर्धा रद्द झाली तर अनेकजण खरोखर रस्त्यावर येतील, असे मत माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केले आहे.
करोनाचा धोका जगभरात आजही आहे. लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत हे मलाही पटते. मात्र, त्याचवेळी जर विंडो खुली असेल आणि सुरक्षेचे सर्व निकष लावले जाऊन जर ही स्पर्धा खेळविण्यात येणार असेल तर माझा त्याला पाठिंबा असेल. ही आता केवळ एक स्पर्धा राहिलेली नाही तर, त्यावर अनेकांचे आयुष्य तसेच संसार अवलंबून आहेत. स्पर्धेशी निगडीत उद्योग, व्यवसाय, कामगार व कर्मचारी वर्गाचे संसार रस्त्यावर येतील याचादेखील विचार केला जावा, असेही त्याने सांगितले.
ज्यांच्याकडे गुजराण करण्याची क्षमता आहे व त्यासाठी वाट्टेल तितका पैसा खर्च करण्याची कुवत आहे त्यांना स्पर्धा रद्द झाल्याने फरक पडणार नाही, मात्र, तळागाळातील जे लोक या स्पर्धेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी तरी स्पर्धा व्हावी असे मला वाटते. देशात लॉकडाऊन आहे. सर्वसामान्य नागरिक ज्यांच्याकडे क्षमता आहे ते आवश्यक वस्तूंचा साठा करु शकतात मात्र, ज्यांना रोज कमवायचे असते व रोज जेवणाचा बंदोबस्त करायचा असतो त्यांच्यासाठी या स्पर्धेतून मिळणारे उत्पन्न खूप महत्त्वाचे आहे, असेही चोप्राने सांगितले.
करोनाच्या धोक्यामुळे टोकियो ऑलिम्पिक, विम्बल्डनसारख्या मानाच्या स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत तर काही स्पर्धा रद्दही झाल्या आहेत. पण या सगळ्यात मजूर किंवा तत्सम कर्मचारी वर्गाचे किती हाल होत असतील याचा विचार का केला जात नाही, असे ठाम मतही त्याने व्यक्त केले.