आकाश चोप्रा व आरपी सिंगने दिला जुन्या मैत्रीला उजाळा
नवी दिल्ली – भारतीय संघात स्थान मिळाल्यामुळे महेंद्रसिंग धोनीशी खूप घट्ट मैत्री झाली. त्याच्या यशाचा आलेख उंचावू लागला मात्र आमची कामगिरी खालावत चालली. काही काळानी संघातील स्थान देखील गमवावे लागले मात्र तरीही धोनीबरोबरच्या मैत्रीत तसूभरही फरक पडला नाही. त्याच्याशी ड्रेसिंगरुम किंवा अन्यत्र जो संवाद होत होता त्याची आजही आठवण येते, अशा शब्दात माजी कसोटीपटू आकाश चोप्रा व रुद्रप्रताप सिंग यांनी आठवणी जागविल्या.
करोनाचा जगभर खेळ सुरु असल्याने बाकी सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. त्यामुळे आजी-माजी खेळाडू सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. त्यातच चोप्रा व सिंग यांचा सोशल चॅटवर संवाद सुरु होता व त्यातून नेटकरी आपल्याही प्रतिक्रिया देत रमले होते.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली टी 20 विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. त्यावेळी सिंग भारतीय संघात होता. इतकेच नव्हे तर त्याच्या गोलंदाजीसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघांचीही वाताहत झाली होती. याच काळात धोनीशी त्याची घट्ट मैत्री जमली. त्यावेळी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या चोप्रा यानेही आपल्या धोनीशी असलेल्या मैत्रीचाही आवर्जुन उल्लेख केला. भारतीय संघात होतो तेव्हा तर प्रत्येक क्षणी धोनीशी संवाद होत होता. त्यावेळी धोनीचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्या उंचीचा होता ते पाहून खरेच आश्चर्य वाटायचे की एका छोट्या शहरातून आलेला हा खेळाडू इतका हुशार कसा असू शकतो. पण त्याच्याशी जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा त्याची मते ऐकल्यानंतर लक्षात यायचे की त्याचा क्रिकेटचा अभ्यास किती दांडगा आहे. खरेच माझ्या संपूर्ण कामकीर्दीत मी त्याच्या इतका प्रसंगावधानी खेळाडू पाहिला नाही.
कोणत्या संघाविरुद्ध, कोणत्या खेळाडूविरुद्ध कशी रणनीती आखायची याबाबत त्याचे सल्ले सामन्याला कलाटणी देणारे ठरलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघच नव्हे तर भारतीय संघातील खेळाडूंमध्ये कोणती बलस्थाने आहेत किंवा कोणते कमकुवत दुवे आहेत याचे त्याला असलेले ज्ञान अविश्वसनिय होते. याच काळात धोनी यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करत होता तर दुसरीकडे आमचा खेळ खालावत चालला होता. संघातील स्थान जरी गमवावे लागले तरी या खेळामुळेच धोनीसारखा मित्र गवसला यातच आम्हाला समाधान आहे, असेही सिंग याने सांगितले.
निवड समितीवर टीका…
सामन्यातील कामगिरी थोडी सुमार झाली होती व त्यामुळे संघातील स्थान गमवावे लागले हे मान्य करतो मात्र, त्यावेळी मला अचानक वगळले गेल्याने आश्चर्य वाटले. याबाबत विचारणा केल्यावर मिळालेले उत्तर खूप निराश करणारे ठरले. अजून मेहनत घे, जास्त सरस कामगिरी कर असे मला निवड समितीने सांगितले. त्यानंतर आयपीएलमध्ये सलग तीन वर्षे मी सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करुनही मला भारतीय संघात कधीही स्थान मिळाले नाही, अशा शब्दात सिंगने निवड समितीच्या निर्णयाबाबत आपली निराशा व्यक्त केली.