मुंबई – चंद्रकांत पाटील हे झोपेत असताना बोलले, की जागे असताना? ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हापासून त्यांना असह्य वाटत आहे. जास्त जागा येऊनही आपण सत्तेत नाही. या गोष्टीची त्यांना बोचणी लागली आहे. तसेच त्यांचे कार्यकर्ते फुटू नयेत, यासाठी सतत ते पुड्या सोडण्याची काम करतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना इशारा दिला.
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’झोपेत तुम्ही सरकार आणलं आहे, त्यावेळी शरद पवार सुद्धा झोपेतच होते, आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत, त्यामुळे सांभाळून बोला’, असा इशाराच चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना दिला. ते पुढे म्हणाले,’ अजितदादा झोपेत सरकार तुम्हीच आणलं होतं. शपथविधीला तुम्हाला काय तलवारीच्या धाकावर नेलं नव्हतं. तीन दिवसांचे भाजप सरकार स्थापन केले होते, त्यावेळी मांडीला मांडी लावून बसला होता. अजितदादा आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत, सांभाळून बोला. कोणतीही तत्व नाहीत. कोणतंही सरकार आलं तरी मी पदावर पाहिजे असं अजितदादाचं वागणं आहे. असं म्हणत पवारांच्या टीकेवर त्यांनी उत्तर दिल आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र झोपेत असतानाच पडेल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी त्यांना टोला लगावला होता आता यावर आज कोल्हापूरमध्ये पत्रकाराशी बोलत असताना चंद्रकांतदादांनी जोरदार पलटवार केला आहे.