विधानसभेत जास्त जागांवर दावा करणार
मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व आहे.कोणत्याही परिस्थ्तीत राष्ट्रवादी कॉंग्रेस इतर पक्षात विलीन करण्यात येणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या मुददयाला अजित पवार यांनी जोरदार विरोध केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ते त्या नोटीसीचे समाधान करू शकतील. मंत्री समितीने ते निर्णय घेतले आहेत. सामान्यांना विमानात बसण्याची सुविधा मिळाली ती प्रफुल्ल पटेल यांच्यामुळेच. सूडाचे राजकारण कोणी कर नये, अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ईव्हीएमबददल अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. झालेले मतदान व मतमोजणी झालेल्या मतदानाच्या संख्येत गोंधळ दिसून येतोय. कर्नाटकमधील 28 तारखेला झालेली नगरपालिका निवडणूक बॅलेट पेपरचा वापर करून झाली. तिथे कॉंग्रेस सर्वाधिक ठिकाणी निवडून आल्याकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.
लोकसभा निवडणुकांत जास्त खासदार निवडून आल्याने आगामी विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसकडून जास्त मतदारसंघांची मागणी करणार असल्याचेही समजते.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने देखील बैठकीत चर्चा झाली.
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कॉंग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी विलिनीकरणाच्या मुददयाला बैठकीत जोरदार विरोध केला. विरोधकांकडून बातम्या पसरविण्यात येत आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ते जपले गेले पाहिजे. कार्यकर्त्यांनी देखील अफवांना बळी पडू नये असेही अजित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील विजयी तसेच पराभूत उमेदवारांसोबत शरद पवार यांनी व्यक्तीशः चर्चा केली. वंचित बहुजन आघाडी तसेच मनसेचा नेमका काय प्रभाव पडला, याचीही माहिती पवारांनी जाणून घेतली.
विधानसभेसाठी जास्त जागांची मागणी
मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 114 जागा तर कॉंग्रेसने 174 जागा लढविल्या होत्या.आता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच तर कॉंग्रेसचा केवळ एकच खासदार निवडून आला आहे.या पार्श्वभूमीवर विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसला जास्त् जागा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिकाही या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे समजते.पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ न बघता जिंकून येण्याची क्षमता पाहून मतदारसंघ सोडण्यात यावा अशी भूमिकाही बैठकीत घेण्यात आली.नगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्यासाठी जागा सोडण्यास नकार देण्यात आला होता.तो निर्णय राष्ट्रवादीला महागात पडला.त्यामुळे आता ही भूमिका घेण्यात आली आहे.