मुंबई -कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जाहीर आणि जहरी टीका केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अगोदर स्वबळाचा नारा देत लक्ष वेधून घेतल्यानंतर पटोलेंनी राष्ट्रवादीवर खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. आता नाना पाटोलेंच्या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय. नाना पटोले यांचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.
पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले,’नाना पटोले आधी काँग्रेसमध्ये होते, मग भाजपमध्ये गेले त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची असते, ती प्रत्येकानं झाकून ठेवावी, असा सल्ला अजित पवारांनी नाना पटोले यांना यावेळी दिलाय.
दरम्यान अजित पवारांनी नाना पटोले यांना पप्रतिउत्तर दिल्याने कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसली? यावरुन आता राजकीय चर्चांना उधाण आलंय.
तत्पूर्वी, राष्टवादी काँग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप पटोले यांनी केला. महाविकास आघाडीला बाजूला सारत भंडारा जिल्हा परिषदेवर भाजप व कॉंग्रेसने हातमिळवणी केली. कॉंग्रेस व भाजपने एकत्र येत कॉंग्रेसने परिषदेचे अध्यक्षपद तर भाजपने उपाध्यक्षपद मिळवले. त्यावरून भुवया उंचावल्या गेल्यावर पटोलेंनी राष्ट्रवादीवरच निशाणा साधत आपल्या पक्षाच्या कृतीचे समर्थन केले.