मुंबई – राष्ट्रवादीच्या जन्मापासून जाती पातीच्या राजकारणाला सुरुवात झाली असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. ठाकरेंनी यापूर्वी देखील हाच आरोप करत राष्ट्रवादीला डिवचले होते. या आरोपानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंचा हा आरोप बिनबुडाचा आणि हास्यास्पद असल्याचे अजित पवार म्हणालेत. माध्यमांशी संवाद साधत अजित पवार यांनी विविध राजकीय प्रश्नांची उत्तरे दिली.
“शरद पवारांचं नाव घेतल्यानंतर ती बातमी होते त्यामुळे राज ठाकरेंनी असं बोलणं योग्य नाही. राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा आरोप आहे. हेच राज ठाकरे पवारांची मुलाखत घेताना काय बोलत होते, म्हणजे इतकं दुटप्पी पण माणसाने वागू नये” असं स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
नेमकं काय म्हणाले अजित पवार यावेळी
महाराष्ट्र गेल्या ५५ वर्षांपासून पवार साहेबांना ओळखतोय. त्यांनी नेहमी शाहू,फुले आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि तशाच पद्धतीने राजकारण केलं. सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन काम केलं. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने असे वक्तव्य करण योग्य नाही. ही हास्यास्पद बाब आहे त्यात तसूभर देखील सत्य नाही असं अजित पवार यावेळी म्हणाले.