मुंबई : राज्यात काल पहिल्यांदा दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. या दसरा मेळाव्यावरून राजकीय नेत्याकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. त्यात आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा टोला लगावला आहे.
याविषयी बोलताना,”मी दसरा मेळाव्यात झालेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही भाषणे ऐकली. मात्र, काहींची भाषणं नको तितकी लांबली” असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच पुढे बोलताना,”आता शिवसैनिकांनी निर्णय घ्यायला हवा. आपली पुढची भूमिका काय असायला हवी. कोणाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, कोणाची मुळ शिवसेना आहे, याबाबत विचार करावा” असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. काहींची भाषण नको तितकी लांबल्याचे अजित पवार म्हणाले. कोणाची लांबली त्याचा विचार आता तुम्हीच करा असेही अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका” असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी रुपये खर्चून बसेसची व्यवस्था केली होती. परंतू, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना एसटी मिळाली नाही असे म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटावर टीका केली. दोन्हीकडील दसऱ्या मेळाव्याला गर्दी होती. ती कशी होती काय होती असेही अजित पवार म्हणाले. झेंडा शिवसेनेचा मात्र, अजेंडा राष्ट्रवादीचा असल्याची टीका शिंदे गटाने केली होती.
यावर अजित पवार म्हणाले की, मंत्रीमंडळात असताना एकनाथ शिंदे यावर कधी बोलले नाहीत. ते माझ्या उजव्या बाजूला बसायचे. आम्हाला अनेक वर्ष विविध पक्ष सोबत घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 1999, 2004, 2009 आणि 2019 ला देखील अनेक पक्षाचे सरकार चालवले आहे असे अजित पवार म्हणाले. आत्तापर्यंतचे निर्णय सर्वांनी मिळून घेतल्याचे अजित पवार म्हणाले. शिंदे गटाची वक्तव्य ही राजकीय स्वरुपाची असल्याचे पवार म्हणाले.
वेदांता प्रकल्पात टक्केवारी मागितली म्हणून तो प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका महाविकास आघाडीवर होत आहे. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. हे अत्यंत चुकीचं आहे. हे सिद्ध करुन दाखवावे असे आव्हान देखील अजित पवार यांनी यावेळी दिले. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानं दोन लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. यातून तरुणांचा रोष आपल्यावर येईल, त्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचे अजित पवार म्हणाले.