अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठकांवर बैठका होत असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास 40 मिनिटं दोघांमध्ये चर्चा सुरु होती. यावेळी दोघांमध्ये सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसंदर्भात तसेच अजित पवारांच्या गटाला मंत्रीपदात मिळणारा वाटा यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपाने मात्र ही बैठक फक्त बहुमत सिद्ध करण्यासंबंधी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसंदर्भात होती अशी माहिती दिली. अजित पवारांसोबत युती करण्याआधीच मंत्रीपदात मिळणाऱ्या वाट्यासंबंधी चर्चा झाली होती असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पाठिंब्याने भाजपा बहुमत सिद्ध करु शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजित पवार यांच्या गटाला 12 मंत्रीपदं आणि 15 महामंडळं दिली जाऊ शकतात. यासर्व घडामोडीत आता राज्यासह देशाचे आज होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.