जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वीकारला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राजीनामा का दिला याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अशातच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी, विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावरील कारवाई थांबणार नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.
अजित पवारांनी राजीनामा का दिला हे मलाही कळत नाही. त्यांच्यात घरातले वाद आहेत की पक्षातले वाद आहेत का, हे तेच सांगू शकतील. आताच निवडणुकीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. अजित पवार साताऱ्यातूनही लोकसभा लढवण्याची शक्यता कमी आहे. जरी ते लढणार असतील तरी आमदारकीच्या राजीनाम्याची गरज नाही. पण खरं कारण तेच सांगू शकतात. अजितदादा माझ्या संपर्कात नाहीत, ना मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांना पक्षात घेण्याचाही प्रश्न नाही. पक्षांतर्गत किंवा कौटुंबीक कुरघोड्या आहेत की ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे, हे मी काही सांगू शकत नाही. हा विषय संभ्रमात टाकणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली.